Tuesday, 22 May 2018

खूप छान कथा सर्वांनी वेळ काढून नक्की वाचा.....

अण्णाभाऊ साहित्य चिंतन
---------------------------------------------------
- कथा :- उपकाराची फेड
-------------------------------------------------------
शंकर चाम्भाराचे घर .
सकाळचा प्रहर .
आठ ते नऊ वाजण्याचा सुमार .
शंकरच्या घरी मनु परीट आलेला .त्याच्या पायातले खेटर तुटले होते अन दुरुस्ती साठी तो शंकर कडे आलेला .मनु हा शंकरचा मित्र .
शंकर त्याचे खेटर उलटे पालटे करून शिवुन देत होता .
शेजारी लाकडाच्या ओंडक्यांवर लखु मांग ताटकळत बसला होता .त्याचीही चप्पल तुटली होती .अन ती हातात घेवुन शंकरचे काम सम्पन्याची वाट पहात होता .
मनु परटाचा गावात दरारा होता. त्याच्या शब्दाला मोल होते .बेचाळीसपासून पुढारी म्हणून तो मिरवत होता .अन असा दरारेबाज मित्र आपनास लाभला म्हणून शंकर भलताच चढला होता .
शंकरचे काम चालू होते अन घरात चहा शिजत होता .
शंकर हातांनी खेटर नीट करत करत तोंडाने बोलत होता .बोलण्यात त्याची बरोबरी करणारा माणूस गावात नव्हता वर्षात चारसहा महीने मुम्बईत राहून हा चाम्भार भलताच ' शाणा ' म्हणून गावात ख्याती पावला होता तो दिल्लीपासून चामड्याच्या बाजारापर्यंत सर्व विषयावर बोलत होता .
विनोद करीत होता.हसत होता नी परीट व मांग याना हसवीत होता .
इतक्यात मळू महार पायाच्या अन्गठ्यात पायताण धरून ओढित तिथे आला .
- (त्यांच्यातील संवाद ) -
शंकर :- का ? घोडं मरगळीला आलं ?
मळू :- हो ,अंगठा तुटला गा !
* मळूने बैठक मारली .
दुरुस्त केलेले परटाचे खेटर शंकरने त्याच्याकडे ' धर घे ' म्हणून सरकावले .
आणि सळ आणि आरी त्याने मळूकडे फेकली .
शंकर :-- हं , घ्या हो हे सामान नी करा नीट पायतानं .
सळ नी आरी घेवून मळू आपलं पायतान सांधु लागला .
लखु मांग :- मला बी दे गा ! पना उपसलाय माझ्या चपलिचा .
शंकर :- वाईच कड काढ ,माझ्यापाशी आरी हाय एक अन मागता दोघं .कशी बरं देवू ? आळीपाळीनं घ्या ; न्हायतर मम्हईच्या भांडणावानी हातंच भांडण लागंल हो .
* असे म्हणून शंकर मोठयाने हसला .
मांगा महाराच्या खेटराला हात लावू नये हा रिवाज तोही काटेकोरपणे पाळत होता .
म्हणून कुठे आरी टोचावी ,कसा सळ ओढावा हे मळूला दुरुनच सांगु लागला .
मळू पुढे पाहून आपले काम करीत होता .
तो कोणाशी बोलत नव्हता .
शंकरला गप बसवले नाही .त्याने खाजवून खरूज काढलीच .
शंकर :- (मनुला ) महाराचंबी घसारलं बरं
मळू :- ते रं कसं ?
शंकर :- त्येनी समितिला मत देवून कॉँग्रेसला पाडलं .
( महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्रासाठी जेंव्हा रान पेटले होते , त्या वेळी तमाम जनता समितिच्या बाजूने एकवटली होती .आणि या मुद्द्यावर निवडणुका होवून संयुक्त महाराष्ट्र समितीला घवघवीत यश मिळाले होते असा इतिहास आहे . )
मळू :- एक बोलु ?
शंकर :-हो हो बोल की -
मळू :- चाम्भारला टाक्यागणिक बुद असती अशी एक म्हण हाय .पण तुला एकबी न्हाय ----
शंकर :- माझ्या टकुर्यात न्हाय आलं !
मळू :- आरं , कॉँग्रेस पडली ह्यात तुझ्या बाचं काय गेलं ?
शंकर :-- तसं नव्हं ,आपुन गरीब चिलटानं हत्तीवर गाडया खेळनं बरं न्हाय -
मळू :- आरं, मग तो हत्ती पडला रं कसा ? बोल ?
* मळूच्या या चिडक्या बोलानं शंकरचा चेहरा खरकन उतरला .तो पेकाट खाजवु लागला .बोलण्यात ख्याती पावलेला शंकर भुईसपाट झाला .
मनु परिट आणि लखु मांग गम्भीर होऊन शंकरकडे पाहू लागले .
एवढयात चहा तयार झाला .शंकर घरात गेला आणि स्वतः चहा पिऊन बाहेर आला त्यानं देवळीत ठेवलेल्या खास कपात लखुला चहा दिला आणि -
शंकर :- मळूनाना ,वाईच चहा घेणार का ?
मळू :-मी चाम्भाराचा चहा पीत न्हाय .
* मळूने हातातली आरी शंकरकडे परत फेकून दिली .मळूच्या बोलानं शंकर चिडला.
शंकर :- मानानं पान खावे असा वाडवडलांचा बोल हाय मळूनाना !
मळू :- पण शेरडावाणी पाला खाऊ नये हा माझा बोल हाय शंकरभाऊ !
शंकर :- म्हंजी काय ?
मळू :-म्हंजी वासरात लंगडी गाय ---
शंकर :- असा तिड्यात का बोलतोस ?
मळू :- माझं बोलणं सरळ हाय .
तू माझा चहा पिणार का ?
शंकर :- त्ये कसं बरं ? जमेना ,तू महार नि मी चाम्भार ----
मळू :- मग आमीच तुझा चहा का
प्यायचा ?
शंकर :- सार्यानी आपापल्या पायरीनं वागावे .
मळू :- तुझी कंची पायरी ? चल नाव घी .
शंकर :- तू आमची बरोबरी करू नगं .तुमी ढोरं ओढता ,कातडी काढता ....
मळू :- आनि ती कातडी चिलबिलून तू संसार करतोस नि वर बेम्बिला थुंका लावून बामन ....
शंकर :- आरं ,मग आम्ही म्हाराचं खावे का काय ? आरं ,अठरा पगड जात देवानं केलीया ,आणि आम्ही तुम्हास्नी सळ नि आरी देतो त्याचे उपकार माना , इसरू नगा..
मळू :- न्हाय इसरत , तुझा सळ नि आरीचा उपकार फेडुनच मी मरेन .
* असे म्हणून मळू वाटेला लागला .
शंकर त्याच्याकडे पहात राहिला .
परीट नि लखु मांग यानी शंकरकडे पाहिलं.
शंकर लाजला .दुःखी झाला .तो परटाकडे वळून हळुच म्हणाला की ,
" म्हारानं माझा अपमान केला "
त्या दिवसापासून शंकर आणि मळू एकमेकास बोलत नव्हते .त्यांच्या मनात शब्दांच्या जखमा चिघळत होत्या .
' सळ नि आरी देतो हे उपकार मान ' हा शंकर चाम्भाराचा बोल मळूच्या काळजात रूतून बसला होता तर
' कातडी चिलबिलून संसार करतोस नि वर बेम्बीला थुंका लावून बामन ' ही मळू म्हाराची डिरकी शंकरच्या वर्मी लागली होती .
पुढे सुगी आली नि गेली .
पावसाळा आला . जनावराना हिरवा चारा मिळू लागला .पण या चार्यासोबत
गावात जनावरांचा रोगही शिरला .
शंकरची म्हैस दगावली .
तो धावतच मळूकडे आला .
शंकर :- मळूनाना, माझी म्हैस मेलीय चल. मळू :- चल कुठं ? मी येवून तुझ्या म्हशीला काय जिती करणार हाय ?
शंकर :-तसं नव्हं --आता बघ .. चल की .
मळू :-त्या मेल्या म्हशीला बघुन मला काय मिळणार ?
* मळूच्या बोलण्याचा रोख कळताच शंकरने मनु परटाचे घर गाठले नि मग दोघांनी गाव उठवले .
" म्हारं चढली लेका -चला , म्हारास्नी आता गाव दिसेना , आरं चला की म्हारुडा द्या फुंकुन " असे म्हणून मनु परटाने अग्ग्या मोहोळ उठवले .गाव बिथरला. परटाच्या आळीतील पोरं हातात घावेल ते घेवून म्हारवाड्याकडे धावत सुटली .
गुरवाने शिंग फुंकले अक्खा गाव बेफाम सुटला .चावडीत रंगू पाटलाला खबर मिळाली .तोही धावत आला .
सगळ्यात पुढे मनु परीट आणि लोकांचा लोंढा बघुन मळू सामोरा झाला .
मळू :- तिथंच थाम्बा ,म्होरं येवू नका .
मनु :-जीव पाहिजे असेल तर मागं सर ...
मळू :--मला नगं जीव .कंटाळा आलाय त्येचा .पर काय भानगड हाय ?
मनु : -मी म्हारुडा पेटवनार हाय
मळू : -तू नगं पेटवू .मीच पेटवतो.पर काय झालं ते आधी सांग .
* इतक्यात रंगू पाटील पुढं झाला .
पाटील :- मळू, काय भानगड हाय कळु दे की --
मळू :-भानगड काय न्हाय .परीट म्हारुडा जाळाय आलाय .
पाटील :- का रं मन्या , काय झालं ?
मनु :- शंकर्याची म्हैस मेलिया नि म्हारं ती ओढित न्हायीत .असली म्हारंच नगं अमास्नी ...
पाटील :- ( बिथरून ) आरं कुणाची बी घरं कुनीबी जाळाय हातं काय मोगलाई हाय व्हय ?
मनु :- मला फासावर चढवा पण मी मागं हटनार न्हाय हो !
पाटील :- आरं तू सतरा वकत फासावर जा रं , पण त्या शंकर्याच्या मेलेल्या म्हशीपायी गाव ढानकाला देवू नगं .
मनु :- मग गावची मेलेली ढोरं कोण ओढणार ?
पाटील :-त्येची तुला का पंचायत ? तुझ्या गोठ्यात शेपूट न्हाय नि का वळवळ करतोस ?
शंकर :-माझी म्हैस म्हारं वढित का न्हायीती ? इचारा .पायताणाचा अंगठा तुटला की त्येस्नी चाम्भार दिसतो .एरवी दिसत न्हाय .
मळू :-का दिसत न्हाय ? दिसतो की.अंगठा तुटला की सळ आणि आरी देतोस .
शंकर :- हो , हो देतोच की -
मळू :-मग थाम्ब तर -
* मळू घरात गेला .
अरूसे व कावडनी घेवून आला .ती ढोरं ओढन्याची अवजारे त्याने शंकर पुढे ठेवली .
मळू :-- ( शंकरला ) एकदा सळ नि आरी देवून तू माझ्यावर उपकार केलास ,आता ही आरूसं आणि कावडनी देवून मी त्या उपकाराची फेड करतोय. ही घेवून जा आणि वढ आपली म्हैस .
शंकर :-आगा, मी ही कावढनी नि आरूसं घेवून काय करू याचं ?
मळू :-सळ नि आरी घेवून म्या जसं केलं तसं तू बी कर ,जमील जमील जा .
मळूचे ते बोलणे ऐकून सारा गाव हसला .
मळूच्या मनातले दुःख सर्वांना उमजले .
आणि आपल्या काळजातली ती जखम भरून आल्यासारखे मळूला वाटले .
मनु परीट मात्र पुरता खजील झाला .
- - कथा समाप्त - --
-------------------------------------------------------संदर्भ :-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ,
निवडक वाड:मय, पान 394
प्रकाशक :महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्क्रुति मंडळ ,द्वितीय अव्रुत्ती 2001
-------------------------------------------------------
- विश्लेषण -
1 :-ही कथा प्रथम युगांतर या साप्ताहीकात प्रकाशित झाली आहे .नंतर ती वर नमुद केल्या प्रमाणे निवडक वाड:मय मधे शासनाच्या साहित्य व संस्क्रुति मंडळाने सामाविष्ठ केली आहे .
2 :ही कथा अम्बेडकरी तत्वज्ञानाधारे लिहिली गेली आहे .
3 : या कथेत जातीय उतरंडीतील सामाजिक संघर्ष दाखवला आहे .
4: अस्प्रुश्यामधेसुद्धा ही उतरंड आहे .
त्याच मुळे बाबासाहेबांना अश्प्रुश्यामधे एकजीवीपणा साधण्यासाठी खूप प्रयास केलेत .
5 :- या कथेत मनु परिट हा परम्परेचा प्रतिनिधि , शंकर चाम्भार हा ही परम्परावादी पण अश्प्रुश्य , लखु मांग हा आत्मविस्म्रूत जगाचा प्रतिनिधि तर मळू महार हा आत्मजाग्रुत अश्प्रुश्य .
6 :- ' तुला आणि मला दोघालाही जर सवर्ण शिवुन घेत नाहीत तर आपल्या दोघात उच्य-नीचता का ? ' असा थेट आणि अप्रत्यक्ष सवाल मळूचा शंकरला आहे .
7:- लखु मांग तर या संघर्षापासून खूप दूर आहे .तो या चर्चेतसुद्धा नाही .
हा लखु शंकरने दिलेल्या खास कपातील चहा गुमान पितो .तिथेच मळू चिडतो पण ते तो बोलून दाखवत नाही .या मधून अण्णाभाऊनी खूप मौलिक असा संदेश दिला आहे .
8 :- या कथेतील घटनांचा मूक साक्षीदार लखु मांग आहे हे खरे आहे पण ही कथांच लखुला जागे करण्यासाठी अण्णांनी लिहिली आहे .अतिशय हळुवार पणे अण्णाभाऊनी त्याला हाताळले आहे .
9 :-मळूची जिगर लखुमधे निर्माण व्हावी व भरकटलेला शंकर चळवळीत मळूचा सहकारी व्हावा .लखुने सुद्धा त्यांना साथ द्यावी अशी अण्णाभाऊची तळमळ आहे .
10 :-अश्प्रुश म्हणून आपण सक्खे भाऊ आहोत .ही विषमतावादी व्यवस्था आपली खरी शत्रु आहे .हे नीटपणे या तिघांनीही समजून घेण्याची गरज आहे हा या कथेचा सारांश आहे .
                     या कथेत माजी अस्प्रुश्य जातीतली क्षितिजसमांतर (Horizontal) असमानता ( महार , मांग व चर्मकार ) हे सामाजिक सर्वहारा ,कारागीर जात (ओबीसी परीट ) हे आर्थिक सर्वहारा व या पासून परात्मिकरण न झालेला पाटिल ...यांच्यातले द्वंद्व समजून घ्यावे लागेल .
                         महार , मांग ,चांभार यांच्यातील अंर्तविरोध समजून घेताना ते ऐतिहासिक भौतिकवादाने त्यांच्या आदिबंधापर्यंत जावे लागेल आणि मग शत्रुभावी विरोधाला अवैमनस्यभावात बदलवून सामाजिक सर्वहारांचे संघठन बांधावे लागेल .
          ..          सदर कथेत अण्णाभाऊंनी दाखवलेली जातवैशिष्ट्ये ,प्रतिके फार काही सांगतात . जास्त बडबड करणारा ,किंवा चिलटांनी हत्तीवर गाड्या खेळणं बरं नाही असं सांगत सुरक्षित राहू इच्छिणारा म्हणून कॉंग्रेसची भलावण करणारा ,महाराला अलग कपात चहा देऊन मी कसा त्यांच्यापासून वेगळा आहे हे दाखवणारा शंकर चांभार ,
           स्वाभिमानाने अपमान सहन न करणारा ,अपमान लक्षात ठेवणारा ,अन् गाव महारवाडा जाळायला आल्यावर त्यांना जागेवरच अडवून सळ आणि आरीच्या "उपकाराची परतफेड " कावड अन् आरूशाने करणारा मळू महार !!!

  महार व चांभाराचे द्वंद्व आपल्यावर पण उलटू शकते हे न लक्षात घेत व्यव्हाराशी व्यव्हार करणारा , व शंकरने "खास" कपातून दिलेला चहा पिणारा अज्ञानी लखू मांग !!!!
     हे सामाजिक सर्वहारा जरी नुसते घेतले तरी त्यांचे प्रबोधनातील क्रांतिकारकत्व दिसते .
     मग पुढे सामाजिक सर्वहारांचे नेत्रुत्व करणारा फकिरा मांग व आर्थिक सर्वहारांचे नेत्रुत्व करणारा सत्तू भोसले हा मराठा कुणबी यांची जोडी क्रांतीदोस्तीचे प्रतिक म्हणून त्यांनी निवडले.
              येणाऱ्या काळात अशाच आशयातून प्रेरणा घेत आपल्याला आंदोलन उभे करावे लागेल !!!!
💐 अण्णाभाऊ साठे साहित्य चिंतन भाग २० 💐
                 -कथा --थडग्यातली हाडं
     -------------------------------------------------------
                           -भाग   १

Hide quoted text

तो दिवस तारगावातील थगडुबाच्या भंडार्याचा दिवस होता. चावडीच्या समोर एक फार जुने असे थडगे ( समाधीचा चौथरा )
होते .यालाच तारगावचे लोक थगडुबा म्हणत .तो देव त्या तारगावातील लोकांना पावत असे अशी लोकांची श्रद्धा होती म्हणून दरवर्षी या थगडुबाचा जंगी भंडारा घातला जाई .आज त्याचीच जंगी रेलचेल तिथे चालली होती.

* तिथे पंगती वर पंगती पडत होत्या .
' गावकुसाच्या आतील एकूण एक माणूस जेवल्या शिवाय महार, मांग ,रामोशी या लोकांची पंगत बसवायची नाही ' हा दंडक कैक वर्षांपासून तिथे पाळला जात असे.

* तारगावात पंगती सुरु होत्या.गावाचा पाटील मधून फिरत होता .
कर्ती बुजुर्ग माणसे
" शुलुक (श्लोक) म्हणा रं !,"
"  पानांवर आन टाकू नका रं कुणी " अशी ओरडत होती.

* दूर उकिरड्यावर पत्रावळ्याचा ढीग लागला होता .डोंबार्याची उघडी नागडी पोरं त्या उष्ट्या पत्रावळ्यातील अन्न झटकून पदरात जमा करीत होती . उकिरड्यावर येणारी पत्रावळ कोरडी ठणान येई , त्यामुळे ' या गावाचीही माणसे हलकट आहेत ' असा त्यां पोरांचा पक्का समज झाला होता .

* चावडीच्या कट्ट्यावर बैल बसले होते . तिथे ती जनावरे कितीतरी रुबाबदार वाटत होती.वतनदार महार मांग आपापली पोरंबाळे घेऊन  पंगती जिथे पडत होत्या तिथे एका बाजूला खाली ताटकळत बसली होती.
* डवरी , डोंबारी , कैकाडी हे उपरी म्हणून दूर बसून पहात होते .
* मांगामहाराची पोरं खिरीच्या कायली वरून नजर हटवत नव्हती .भुकेच्या तळमळीने कासावीस होऊन जाम्भया देत होती .तर पंगतीतून ढेकरांच्या आवाजाने तो परिसर दुमदुमत होता.
* नाना महाराचा बारा वर्षांचा किशा तर अगदी भुकेने व्याकुळ व्याकुळ झाला होता .गावातले हे वरचे लोक कायलीतली सारीच खीर संपवतील अशी त्याला भीतीही वाटत होती .

* रात्री दहा वाजण्याचा सुमार झाला.काठी टेकत टेकत  राणोजी रामोशी आला .त्याचे वय किमान नव्वद वर्षांचे तरी असावे .तो आल्यावर मांगामहाराच्या पोरास्नी बरं वाटले .एका मांगाला रहावले नाही. तो राणोजीला म्हणाला ,
" नाईक, आमची दाद कवा लागायची  ? "
" हे असंच हाय हितं.ज्येच्या हाती ससा तो पारधी ! या गावात न्याय न्हाय !  इमानदारीची दुनिया न्हाय ! बरं एक भानगड हाय सांगू का  ? "राणोजी बोलला.
" हं ,सांगा. पंगती संपतील तवर हं ,बोला " सर्वजण बोलले.

-                   भाग   २

सर्वानी ऐकायचे कबूल करताच त्या नव्वद वर्षाच्या रामोशाने एक कथा सुरु केली. ती अशी........

फार फार वर्षांपूर्वी या तारगावावर एक संकट आले होते. बजाजी नावाच्या त्यावेळच्या पाटलानं गावात दवंडी देऊन सारा गाव चावडीत गोळा केला .
चावडीत मांग महार रामोशी एका बाजूला, तर मोठमोठे सावकार, गुजर ,मारवाडी,पाटील अन ईनामदार हे दुसर्या बाजूला बसले
सर्वांच्या डोळ्यापुढे मृत्यू थैमान घालत होता .कारण---
अतिशय मात्तबर अशा मल्ल्या दरोडेखोराचा तारगावाला निरोप आला होता की,
" सात हजार रुपये खंडणी दिली तर ठीक न्हायतर तारगाव जाळून राख करू , दोन दिवसात रक्कम नाही आली तर शिक्याची सुईसुद्धा वाचू देणार नाही "  अशी सक्त ताकीद त्या मल्लूने दिली होती अन त्यामुळे सारा गाव हादरून गेला होता .'आता काय करायचे '
चावडीत गावकरी यावर चर्चा करू लागले.

(  त्यांच्यातील संवाद इथे देत आहोत )

पाटील : - हं, बोला, सात हजार रुपये देऊन गाव राखायचा का आपली राख करून घ्यायची ? काय ते ठरवा .
भाऊराव जमीनदार :- गावावर वर्गणी बसवून रक्कम उभी करून मल्लू कडे भरावी. आमची वर्गणी कधीही घेऊन जावी.
मांग महार :- आम्ही वर्गणी देणार नाही .
लखु रामोशी : - आमच्या कडे बळ हाय .पैका मातर न्हाय नि खंडणी भरणं नामुस्कीची बाब हाय. आम्ही खंडणी देणार न्हाय.
भूपत वाणी : - मग काय देणार ?
लखु रामोशी :- पैका देणार न्हाय .त्यो आमच्या पाशी न्हाय.आम्ही आपला जीव देऊ .हाय कबूल ?
रायनाक महार : -- नाईक, खासा बोल केला .खंडणी का दियाची ? लढाई देऊया , येऊ दे मल्ल्याला .
एक मोठा सावकार :-- आरं, पर त्यो आल्यावर त्याला अडवणार कोण ?
लखु मांग : - ( उठून खाडकन शड्डू मारून ) येऊ दे, आमी आडवतो. त्येच्यापाशी काय तोफखाना न्हाय. नि पळून मरणं टळत नसतं. पळून मरण्यापरीस टाचावर मरुया.
ईनामदार :-- वा रं मरणार ! एका दणक्यात मराल नि लूट आमची होईल.तुमचं काय ? खोपटं जाळतील ! परंतु आमचे वाडे ...त्याचं काय ? मल्लूने किती गावे जाळली लक्षात आहे का ? खंदाडीभर बोलून जाल नि मरू आम्ही .ते काही नाही -- रक्कम भागवा.
रायनाक महार :-- आम्ही पळणार न्हाय .आमाला खंडणी भरायची न्हाय .आमी पळणार न्हाय .बेलभंडार उचलून जीव देऊ.
भूपतचंद : - तुमच्या जीवाची किंमतच काय आहे ? तुम्ही मराल पण आम्ही साफ बुडू-मरू.
पाटील  : - ऐका मंडळी ,मांग, महार,रामोशी जे म्हनत्यात,ते खरं हाय. खंडणी भरून अपेश घेण्यापरीस लढून मरणं बरं ,असं माझंबी मत हाय .जर आम्ही कर्ती माणसं मेलो तर नाव व्हईल -नि जगलो तरीबी सारा वारणाखोरा दुवा दील .आगाजा गाजेल .
रायनाक महार :- मेलो तर गावासाठी.
लखु मांग :- आम्ही जगलो तर मानानं जगू.
सक्या रामोशी  :-मरणाम्होरं पळून जगणारी आमची औलाद न्हाय !
सर्व धनवान :-- खुशाल मरा लेकानू ! आम्ही निघालो तालुक्याला. मरण काय खेळ आहे  ? तुम्ही मराल पण इतरांचे काय  ? आमचे काय होणार ?
   -     तर अशा तर्हेने कडाक्याचे भांडण होऊन बैठक उठली .

सर्व श्रीमंत कामाला लागले . त्यांनी आपली मुलंबाळं ,दौलत लगेच रातोरात हलवली .त्यामुळे इतर गोरगरीबांचा धीर खचला .परंतु पाटलानं लोकांत आग पेटवली आणि तयारी केली . लोकांनी आपल्या  तरुण मुली परगावला पाहुण्या घरी पाठवल्या , बायकापोरं नातलगाकडे पाठवली .  '  दरुडा येणार हाय , मदत करा  ' असं पाटलांनं सरकारात कळवलं आणि तो मदतीची वाट पहात राहिला ; परंतु उत्तर आलं नाही.

अखेर ती भयानक रात्र आली .कृष्ण पक्ष चालू होता .चंद्राला आज सहावी घडी होती .
गावात शिरणाऱ्या तिन्ही वाटा ( पांदी ) लोकांनी रोखल्या.
* मावळतीची वाट सख्या नाइकाने दाबली . त्याच्या हाती भली मोठी कुर्हाड होती.
* उगवतीकडे लखु मांग उभा होता .त्याच्याही हाती कुर्हाड होती ,गावावर चालून येणाऱ्या शत्रूला तोडण्यासाठी तो सिद्ध झाला होता.
*लक्ष्मीची पांद रायनाक महारानं रोखली होती .त्याच्या हातात काढणीचा विटा हे हत्यार होतं .आपल्या उजव्या हाताला काढणी खुटवून तो तयार होता .
* पाटील हातात नंगी तलवार घेऊन सारखा फिरत होता.

त्याच वेळी मल्ल्याच्या माणसाच्या तीन टोळ्या तारगावात घुसल्या .स्वतः मल्ल्या लक्ष्मीच्या पांदीनं घुसला .गाव बेसावध असेल असे त्याला वाटले .
चावडीपुढचं हत्याराचं बुचाट विस्कटून पाटील  '  सावध ' म्हणून जोरात ओरडला. घाईनं मल्ल्यानं शिंग फुंकून आपल्या माणसांना सावध केलं .मल्ल्याची वाट रोखताच हाहाकार उडाला.हाणामारीला सुरुवात झाली .
पूर्वेला लखु मांगाच्या कुर्हाडीने कहर केला तर मावळतीला सक्या नाईकाला धुंदी चढली .
रायनाकच्या हातातील विटा विजेप्रमाणे चालू लागला . तिन्ही पांदीत मल्ल्याची माणसे धडाधड कोसळू लागली .
" मारा ! हटू नका ! म्होरं येणाराला चेचून काढा " रायनाक ओरडला.
" माणूस हेरून मारा " लखु मांग गरजला.
हातात तलवार घेऊन पाटील सगळी कडे धावू लागला त्यामुळं पाटील आपल्या पाठीशी आहे असे प्रत्येकालाच वाटत होते .
समोर लढत असलेल्या मल्ल्याला चावडी समोरील मधल्या चौकात नेऊन गारद करायचा असे ठरवून रायनाक नकळत मागे मागे सरू लागला .मल्ल्याला गर्दीतून रायनाकने नेमके हेरले होते.
रायनाकच्या हातातील विटा प्रत्येक घावाला एक एक जणाला टिपू लागला .रायनाकच्या हातात कोणते हत्यार आहे हे त्या गर्द काळोखात समोरच्याला कळत नव्हते .मल्ल्या भाम्बाऊन गेला होता.  चंद्र थोडा वर आला अन रायनाक च्या हातातील भयंकर हत्यार हे काढणीचा विटा आहे हे मल्ल्याने ओळखले . तो जरा फटकून लढू लागला पण  रायनाक माघार का घेतोय हे त्याच्या लक्षात आले नाही .

मधल्या चौकात येताच रायनाक ने उलटून मल्ल्याची वाट दाबली आणि सर्व दरोडेखोर चौकात कोंडले .
रायनाकने मल्ल्याला चावडीकडे रेटला मल्ल्या चावडीच्या ओट्यावर गेला तो सरळ होणार तोच रायनाक ने विटा फेकला .पोत्यात सामता शिरावा तसा मल्ल्या चा उर फुटला .पण ताकदवान मल्ल्या खाली कोसळला नाही त्याने चावडीच्या खांबाला मिट्टी मारली .
आपलाच वार चुकला असे वाटून रायनाक ने पुन्हा विटा फेकला पण घात झाला ! विटा खांबात रुतून काढणी तुटली .रायनाकचा तोल गेला . तीच संधी साधून मल्ल्याच्या एका माणसाने रायनाकच्या डोक्यात कुर्हाडीचा वार केला रायनाक कोसळला . मल्ल्या ओरडला " पळा पळा ! घात झाला ! मेलो ! "
दरोडेखोर पळण्याचा प्रयत्न करू लागले पण कैक वार अंगावर झेलूनही लखु आणि सक्या लढतच होते. ते वैर्याला जिवंत  पळूच देत नव्हते .
अखेर एकूण एक दरोडेखोर टिपल्या वरच लढाई थाबली .पाटीलही
रक्तबंबाळ झाला होता त्याच अवस्थेत त्याने सर्वाना एकत्र केले.   कैक जण घायाळ झाले होते .मल्ल्याचे धूड खांबाशेजारी पडले होते आणि रायनाक महार तार गावाला अंतरला होता .रायनाक कोसळलेला पाहून पाटलाने हंबरडाच फोडला .
दुसर्या दिवशी सरकारी माणसांनी सर्व मुडदे तालुक्याला नेले .

पाटलाने रायनाकच्या देहाला अग्नी दिला .
त्याची हाडं आणून चौकात थडगे बांधले . त्यासाठी वापरलेल्या एका दगडा वर अक्षरे कोरली,
'  गावासाठी मरणारा मर्द ! '
पुढे त्याचा भंडारा सुरु केला .

काहींना महाराची महती रुचली नाही .त्यांनी तो अक्षराचा दगड काढला .पुढे ते स्थान ' थगडुबा ' या नावाने ओळखले जाऊ लागले .अर्थातच भांडार्यालाही  ' थगडुबाचा भंडारा ' असे म्हंटले
जाऊ लागले .
रायनाकचं नाव दडवलं, करणी दडवली. पण....
राणोजी रामोशी थांबला .त्याचा कंठ दाटला होता .त्यांनं समोर थडग्याकडे पहात हात जोडले आणि कापर्या आवाजात म्हणाला ,
" या थडग्यात रायनाकची हाडं हायती "

-                भाग   ३

Hide quoted text

'  या थडग्यात रायनाकची हाडं हायती '  याच वाक्यावर राणोजी रामोशी याने सुरु केलेली कथा संपली आणि एवढ्यात देवाजी सावळा पाटील दुःखी चेहरा करून पुढं आला आणि आवेगाने म्हणाला , 

" हं ,चला गा. खीर संपलीय.भात आमटी घ्या .परसाद थोडा थोडा "


हे ऐकून नाना महाराचा किशा भडकला .त्याला वाटत असलेली भीती खरी ठरली होती .
रामोशी पोटतिडकीने  किशाला दुजोरा देत म्हणाला ,
" खरं हाय किशाचं , त्या थडग्यात या गावासाठी मरणाऱ्या रायनाक महाराची हाडं हायती . रायनाकचा पोरगा सिंधू महार ,  सिंधुचा पोरगा महादू महार ,  महादूचा पोरगा नाना महार अन नानाचा ह्यो किशा -रायनाकाची बहाद्दर अवलाद ; पण रायनाकाच्या भांडार्यात त्येला खीर न्हायी .सारी खीर गाव गिळून गेला ! पण हे पाप हाय . कुठं फेडणार ह्यो गाव ?
  " आता काय करायचं नाईक  ? घोटाळा झालाय "  पाटील कण्हत म्हणाला .
' खीर संपलीय ' म्हणताच  किशा उठला आणि खांद्यावरची पैरण (सदरा) झटकून महार वाड्याची वाट चालू लागला .
त्याच्या कडे पहात रामोशी म्हणाला ,
"  ह्या थडग्यातली हाडं तुमची हायती . जावा घरला नि दुसरा भंडारा घाला, पर ह्ये मेल्याचं अन्न खाऊ नका. ह्यो मी बी निघालू  .नगं आमास्नी तुमचा परसाद ! "
असं म्हणून राणोजी ही किशाच्या मागोमाग दमदार गतीनं निघाला.तशी सर्व मांग अन म्हारंपोरं उठून प्रसाद न घेताच निघाली .

--------समाप्त ----------------
संदर्भ : कथासंग्रह ' आबी  '
पान १११ ते १२०
----------------------------------
-           विश्लेषण :

१ : या जातीप्रधान देशात विषमतेची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत आणि त्यामुळे मानवी मुल्याचे कसे हनन होते हे सांगणारी अण्णाभाऊची  ही आणखी एक प्रतिनिधिक कथा .

२ :  गावगाड्यात याच जातीयतेने सोशीत बांधवाना क्रूरपणे दडपण्यासाठी कैक क्रूर समज आणि रूढी बनवल्या होत्या . 

' गावाच्या देवाचा भंडारा असताना गावातील सर्व सवर्ण बांधवांची जेवणे झाल्या शिवाय महारमांगाच्या पंगती बसू द्यायच्या नाहीत ' असा  दंडक कैक गावात  होता .मी स्वत: हे माझ्या गावीसुद्धा लहानपणी अनुभवलेले आहे .संध्याकाळी सात वाजता पंगती सुरु व्हायच्या तर आमची मांगामहारांची दाद पहाटे  लागायची .असो.

तारगावात भंडारा सुरु असताना, बैलासारख्या जनावरांनी चावडीत बसणे , मांगामहारानी पंगती पासून दूर बसणे, डवरी डोंबारी मुलांनी उकिरडया वरच्या पत्रावळीत अन्नाचे कण शोधणे या बाबी या व्यवस्थेचे क्रूर दर्शन घडवून देणाऱ्या आहेत . तर

३ : तारगावात दरोडेखोराशी कसा मुकाबला करायचा या विषयानुसार झालेल्या चर्चेत गोरगरीब मांग ,महार अन रामोशी लोकांनी गावासाठी बेलभंडार उचलून प्राण अर्पण करण्यास सिद्ध होणे या बाबी पाहिल्या की थक्क व्हायला होते. तर धनवानांनी या मांग महार रामोशाना ' तुमच्या जीवाची किंमतच काय ? 'असे विचारणे म्हणजे त्यांची या पामराकडे बघण्याची दृष्टी किती हीन आहे याचा प्रत्यय येतो .


सख्या रामोशी ,लखु मांग यांच्या पराक्रमाची व रायनाक महाराच्या शहीदत्वाची आठवण जातीय द्वेषातून पुसली जाणे , समाधीचा विशिष्ठ दगड की ज्यावर ' गावासाठी मरणारा मर्द ' असे लिहिलेले असते  तो काढून  थगडुबा हे देवाचे नाव देणे म्हणजे पराक्रमी इतिहास म्हणजे आदर्श वाद पुसून त्या जागी केवळ अनाकलनीय श्रद्धा संदर्भ म्हणजे दैववाद ठेवणे असा प्रकार आहे .

४ : राणोजी रामोशी याचे गावाच्या पाटलाशी वर उद्वेगाने बोलणे म्हणजे या व्यवस्थेवर उगारलेला विद्रोही हात आहे .

५ :  निदान भंडाऱ्यादिवशी तरी महार, मांग ,रामोशी यांना सन्मानाने वागवून  त्यांचा गावाने  वास्तविक गौरव करायला हवा होता पण तसे होत नव्हते .  अगोदरच्या पिढीने याची काळजी घेतली होती . दरोडे खोराशी लढलेल्या मांग रामोशी व महार यांच्या पराक्रमाच्या सर्व आठवणी त्यांच्या नावासकट पुसून टाकण्याचे काम त्यांनी चोख बजावले होते . जातीय द्वेषातून हे सारे उद्भवत आले आहे .त्यांनी दगडाला देव बनवले आणि माणसाचे माणूसपण नाकारले .म्हणूनच थगडुबा त्यांना पावत होता पण मांग महार रामोशी यांनाही आपल्या सोबत जेवावयास बसवून माणुसकी दाखवायची त्यांची  सद्सद्विवेक बुद्धी जातीद्वेषाने नष्ट पावली होती .

६  : ' जातीद्वेषाने उपेक्षिलेल्या बांधवानो, आपला भूतकाळातील पराक्रमी इतिहास विवेकाच्या व अभ्यासाच्या सहायाने नीट शोधून पहा ' असेही जणू अण्णाभाऊना सांगायचे असावे .

७ : मांगिरबाबाच्या संदर्भात सुद्धा असाच प्रेरणादायीं इतिहास समोर येण्याची शक्यता आहे . मंगळूरपिर च्या मांगिरबाबाचा तरी मांडे सरांच्या ' गावगाड्याबाहेर ' या पुस्तकात वर्णन केल्या प्रमाणे इतिहास तसाच आहे.

८ : राणोजीने व्यक्त केलेल्या विद्रोहाला साद म्हणून नाना माहाराचा किशा आत्मसन्मानि जाणिवेने घराकडे परसाद (प्रसाद) न घेताच गुमान चालू लागतो . या व्यवस्थेने प्रसाद या बाबी भोवती एक भावनिक व टाळता न येणारे रूढ वेष्टन तयार केले आहे .राणोजी व किशा ते नाकारतात आणि हाच या व्यवस्थेला दिलेला नकार आहे .

चळवळीत अथवा प्रगतीच्या टप्प्यावर अशा प्रकारचा नकार खूप आवश्यक असतो .असा नकार आपली अंत:शक्ती वृद्धिंगत करणारा वा त्या शक्तीचा स्फोट घडवून आणणारा ठरतो.त्यातून नवे सृजन घडून  येत असते .व्यक्तिमत्व विकास संकल्पनेत 'नाही म्हणता येणे 'हाही एक महत्वाचा मुद्दा आहे .

९ : अण्णाभाऊनी वरील नकारमुल्य खरोखरीच एका वेगळ्या साहित्यिक कौशल्याने गुंफले आहे  कारण ही संस्कार गुंफण शोषितांमध्ये झुंजण्याचे एक नवे आत्मबळ देणारी व वरच्या म्हणवल्या गेलेल्या समूहाला  किंचितसाका होईना पण पश्चाताप करायला लावणारी आहे .सामाजिक सोहार्दा साठी हे आत्मबळ आणि पश्चाताप या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.

१० : या व्यवस्थेत अजूनही सुजाण म्हणवणार्या बांधवानी  पश्चाताप करणे खूप बाकी तर आहेच शिवाय सर्व सोशीत जाती समूहामध्ये व्यवस्थेशी झुंजण्याचे आत्मबळ येण्यासाठी व्यापक अशा नकार मुल्याचे मोल जाणून त्यांनी त्याचा सन्मानही करणे आवश्यक आहे .रुढीने ग्रस्त झालेल्या शोषितसमूहाला याची नितांत आवश्यकता आहे .

धन्यवाद!
थोर अण्णाभाऊना वंदन !  !

हा प्रयास आवडल्यास आवर्जून कळवा ,

आपलाच,

मा धो खिलारे ,सहायक अभियंता,

नासिक.   मो नं 70305 44660

Sunday, 22 April 2018

नोकरी संधी एप्रिल २०१८ 


राष्ट्रीय बियाणे महामंडळात २५८ जागा
• मॅनेजमेंट ट्रेनी - ५८ जागा

मटेरियल मॅनेजमेंट - २ जागा
असिस्टंट कंपनी सेक्रेटरी - १ जागा
प्रॉडक्शन - २७ जागा
मार्केटिंग - ९ जागा
ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग - ३ जागा
सिव्हिल इंजिनिअरिंग - २ जागा
एचआर - ७ जागा
फायनांस आणि अकाऊट्स - ७ जागा

शैक्षणिक पात्रता - 
६०% गुणांसह बी.एससी (ॲग्रीकल्चर), एमबीए / एम.एससी/ बी.ई / बी.टेक (ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग)(सिव्हिल) / सीए / सीएस

वयोमर्यादा - 
५ मे २०१८ रोजी २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

• सिनिअर ट्रेनी - ७८

मार्केटिंग - ४८ जागा
एचआर - १ जागा
फायनान्स आणि अकाऊन्टस - ६ जागा
ॲग्रीकल्चर- १८ जागा
क्वॉलिटी कंट्रोल - २ जागा
हॉर्टिकल्चर - ३ जागा

शैक्षणिक पात्रता - 
५५% गुणांसह एमबीए (ॲग्रीकल्चर व्यवसाय व्यवस्थापन) / बी.एससी (अॅग्रिकल्चर)किंवा पदविका (ॲग्रीकल्चर / सिव्हिल / इलेक्ट्रिकल)

वयोमर्यादा - 
५ मे २०१८ रोजी २३ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

• डिप्लोमा ट्रेनी - १२

ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग - ८ जागा
सिव्हिल इंजिनिअरिंग - ४ जागा

शैक्षणिक पात्रता - 
५५% गुणांसह डिप्लोमा (ॲग्रीकल्चर / सिव्हिल / मेकॅनिकल)

वयोमर्यादा - 
५ मे २०१८ रोजी २३ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

• ट्रेनी - ८९ जागा

ॲग्रीकल्चर - २७ जागा
एचआर - २२ जागा
अकाऊन्टस - ११ जागा
स्टोअर - ११ जागा
टेक्निशिअन (इलेक्ट्रिशिअन) - ५ जागा
स्टोअर (टेक्निकल) - २ जागा
डाटा एंट्री ऑपरेटर (DEO) - ११ जागा

शैक्षणिक पात्रता - 
६०% गुणांसह बी.एससी (ॲग्रीकल्चर) बी.कॉम / बी.एससी (ॲग्रीकल्चर) / Chemistry/ Botany/ ITI/ BCA/ B.Sc. (Computer Science/IT)

वयोमर्यादा - 
५ मे २०१८ रोजी २३ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

• ट्रेनी मेट - २१ जागा

ॲग्रीकल्चर - २१ जागा

शैक्षणिक पात्रता - 
१२ वी उत्तीर्ण किंवा समतुल्य

वयोमर्यादा - 
५ मे २०१८ रोजी २० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 

• परीक्षा - 
२७ मे २०१८

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 
५ मे २०१८ 

• अधिक माहितीसाठी - 
https://goo.gl/W2J8WP

• ऑनलाईन अर्जासाठी - 
https://goo.gl/HJ9rEY
मातंग पंचायतन संघ हे मातंग समाजाला सांस्कृतिक,सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या एकत्र आणणारे संघटन आहे. यामध्ये व्यक्ती गौण आहेत, विचार श्रेष्ठ आहे. व्यक्ती किती येतील आणि जातील. व्यक्ती भोवती फिरणारे कार्य जास्त दिवस टिकत नाही. याची मातंग पंचायतन संघाला जाणीव आहे. ज्यांना मातंग समाजासाठी सांघिक कार्य करावेसे वाटते त्यांनी आम्हाला संपर्क करावा. ज्यांना घराबाहेर जग आहे अस वाटते त्यांचे स्वागत.
मातंग पंचायतन संघ महाराष्ट्र राज्यकार्यकारणी
१]मा.श्री.मधुकरजीकांबळे-९८६९४६१२५३
(संस्थापक अध्यक्ष )
२]श्री सुरेशजी काळोखे ९५९४२९३०३८(अध्यक्ष)
३)डॉ.श्री.शिरीषजीजाधव-९८२०९३०३४१ (उपाध्यक्ष)
४]श्री.विश्वनाथजीशिरसाठ-८१०८०९८४७०
[कार्याध्यक्ष ]
५ ] ऍड श्री. डी. आर.माकणीकर ९०८२०३४७०७ -[सरचटणीस]
६]श्री,अनिलजी जाधव ८६५५२८८०३५ -[सहसचिव]
७]श्री सुनीलजी तांबे - ९००४२५०२७९ [खजिनदार]
८ ]सौ .सविता ताई चव्हाण-८८५०६४०६३२ 
[सह खजिनदार]
९]सौ.मंगलाताईमधुकरकांबळे-९९६९९८६७०४
[कार्यकारणी सदस्य ]
१०]श्री.दत्ताजीतोरडमल-८२९१९२३४०९
[कार्यकारणी सदस्य
११)श्री.तानाजीभोंडवे-८१०८६६१७००
(महाराष्ट्र प्रदेश राज्यसंघटक)